नवी दिल्ली,
राज्यसभेच्या 12 सदस्यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी करीत काँग्रेस, डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातल्याने आज सोमवारी पुन्हा राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब होण्यापूर्वी सदस्यांच्या गोंधळातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागालॅण्डमधील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबाबत निवेदन दिले.
सुरुवातीला त्यांनी लोकसभेत सादर केलेल्या निवेदनाप्रमाणेच ते होते. तत्पूर्वी विरोधकांच्या गोंधळामुळे चार वेळा राज्यसभेचे कामकाज तहकूब करावे लागले होते. दुपारी चार वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर पीठासीन अधिकारी हरीवंश नारायणसिंह यांनी अमित शाह यांना निवेदन सादर करण्यास सांगितले.
ते निवेदन सादर करीत असताना विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू ठेवली.
अमित शाह यांचे निवेदन संपल्यावर हौदात उतरलेल्या सदस्यांनी आपल्या जागेवर बसावे. ते अमित शाह यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण मागू शकतात, असे हरीवंश यांनी सदस्यांना सांगितले. मात्र, विरोधकांचा गोंधळ सुरूच असल्याने त्यांनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केले.
त्यापूर्वी दुपारी तीन वाजता इंधनाचे वाढते दर आणि महागाईवर पीठासीन अधिकार्यांनी चर्चा सुरू केली. या मुद्यावर बोलण्यासाठी त्यांनी मल्लिकार्जुन खडगे यांचे नाव पुकारले. मात्र, पहिले 12 सदस्यांचे निलंबन मागे घ्या आणि त्यानंतर चर्चेत सहभागी होण्याची परवानगी द्या, असे खडगे यांनी सांगितले.
