खा. सुनील मेंढे यांची संसदेत मागणी
आज पिक जगविण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. अशा वेळी राज्य सरकारकडून कृषी पंपाची वीज जोडणी कापण्याचे काम केले जात आहे. या ना त्या कारणाने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना संकटात टाकण्याचा प्रकार राज्य सरकारकडून होत असून वीज कापण्याचा हा प्रकार बंद करावा व कापलेल्या वीजजोडण्या पूर्ववत करून द्याव्यात अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी संसदेत एका प्रश्न द्वारे केली.
सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आज खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातला.
धान्याचे कोठार म्हणून ओळखल्या जात असलेल्या या जिल्ह्यातील 90 टक्के शेतकरी भाताची लागवड करतात. भाताचे पिक जगविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. सध्या शेतकऱ्यांना धानपीक व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टीने पाण्याची गरज असून याच वेळी मात्र राज्य शासनाकडून कृषी पंपाची वीज जोडणी कापण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. यामुळे सिंचनात अडचणी येत आहेत. आधीच शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच प्राधान्य देत शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे प्रकार पुढे येत आहेत.
अशात वीज जोडणी कापून पाण्याशिवाय पीक संपविण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे, असेही खा.सुनील मेंढे म्हणाले.
राज्यसरकारने कोरोना काळात मोफत वीज देण्याची घोषणा केली मात्र त्याची अंमलबजावणी अजून पर्यंत केली नाही. शेतकरी वीज बिल भरण्यास तयार आहेत, त्यासाठी त्यांना आधी पीक घेणे गरजेचे आहे. पाण्याअभावी ते शक्य झाले नाही तर विज बिल भरणे अडचणीचे होईल.
त्यामुळे राज्य सरकारने कृषी पंपाच्या वीज जोडण्या कापण्याचे काम बंद करावे व कापलेल्या जोडण्या पूर्ववत करून द्याव्यात अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी सभागृहात बोलताना केली.
