भंडारा : दुचाकीने जाणाऱ्या तरुणाला वाटेत अडवून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात तरुणाची निर्दयीपणे गळा चिरून हत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वर्दळीच्या मार्गावर जमनी (दाभा) येथील गणेश नगरी जवळ घडली.
राहुल उर्फ बंटी लालचंद जयस्वाल (३०) रा. राजेंद्र वॉर्ड, शुक्रवारी असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी वरठी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहुल हा कोथूर्णा येथून भंडाराकडे येत होता. काही इसमांनी त्याला वाटेत अडविले. यावेळी दबा धरुन बसलेल्या आरोपीने राहुलच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली आणि त्याच्यावर सपासप वार करून गळा चिरला.
रक्ताच्या थारोळ्यात राहुल गाडीवरून खाली कोसळला आणि आरोपी पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच वरठीचे पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. वरठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोधार्थ वरठी पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले आहे.
