भंडारा: गोसेखुर्द धरण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे वैनगंगा नदी पात्राच्या जल स्तरात मोठी वाढ झाली आहे. धरण प्रशासनाने बुधवारी रात्री आठ वाजता दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले होते, त्यातून ३७३ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गुरुवारला सकाळी सात वाजता पाच दरवाजे उघडून त्यातून 996 क्युमेक्स पाणी विसर्ग करण्यात आला.
आता दुपारी तीन वाजता धरण प्रशासनाने आणखी चार नवीन गेट उघडले असून धरणाचे आता ९ गेट अर्ध्या मीटरने उघडण्यात आलेले आहेत. त्यातून ११२५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे, नदी काठावरील आणि नदीपात्रातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
